ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचं आज निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. मागिल काही दिवसांपासून मृणालताई आजारी होत्या. आज दुपारी वसई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार घेत असताना मृणालताई यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. वसईतल्या लोकसेवा मंडळ सभागृहात त्यांचं पार्थिव संध्याकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मृणाल गोरेंवर उद्या दुपारी 12 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
सर्वसामान्यांचा आवाज.. हीच मृणालताईंची ओळख. 1928 साली मोहिलेंच्या घरात त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात वैद्यकीय शिक्षण घेतानाच त्यांनी समाजकार्यात उडी घेतली. डॉक्टरांपेक्षाही समाजाला समाजसेवकांची गरज आहे, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी डॉक्टरकी सोडली. त्या गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाल्या होत्या. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी राष्ट्र सेवा दलात प्रवेश केला. वर्षभरातच त्यांनी इतर काही तरुणांसोबत सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली.
चळवळीतच त्यांची ओळख केशव गोरेंशी झाली. लग्नानंतर दोघांनी मिळून मुंबईत नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं केली. त्यांना नागरी सुविधा मिळाव्यात, गरिबांच्या झोपड्या वाचाव्यात, म्हणून त्यांनी सत्याग्रह केले. पुढे मृणालताई आणि केशव गोरेंनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.
1961 साली त्या मुंबई महापालिकेवर निवडून गेल्या. लोकांना प्यायला पाणी मिळावं, म्हणून त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्यासाठी त्यांना पाणीवाली बाई अशी ओळख मिळाली. महापालिकेचं कामकाज मराठीतच व्हावं, यासाठी त्यांनी आग्रह धरला. 1972 साली विधानभेवर निवडून गेल्यावर मृणालताईंनी दलितांच्या, महिलांच्या, आदिवासींच्या समस्या धडाडीने मांडल्या.
गोरगरीबांना हक्काची घरं मिळावीत, म्हणून त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्यांच्यामुळे नागरी निवारा परिषदेअंतर्गत 6 हजार घरं बांधण्यात आली. म्हणूनच त्यांना सर्वसामान्यांचा आवाज म्हटलं गेलं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी व्यासपीठ